कौटुंबिक हिंसाचारबाबत महिलांमध्ये जनजागृतीसाठी ऑनलाइन शिबीर मोहीम राबवणार - अभिनेत्री अश्विनी महांगडे
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांचा अनोखा उपक्रम
मुंबई(शांत्ताराम गुडेकर) कोरोना महामारीने संबंध मानव जातीला हादरवून सोडले आहे. लॉकडाउनच्या काळात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण हे अधिक वाढल्याचे नुकतेच सांगण्यात आले. प्रत्येक महिला ही माता, भगिनी, बायको असते. घर शांत, हसरे राहावे यासाठी महिलांना बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यांच्यातला सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवावा यासाठी घरातील सर्व माणसांनी या स्त्रीला सांभाळून घेतले पाहिले. तिचा सन्मान केला पाहिजे. आता कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने ऑनलाइन जनजागृती शिबीर ही मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी दिली.रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य हे कायम सेवेचे ठायी तत्पर आहेत. त्यांच्या कामाची पद्धत ही आजच्या युवा पिढीचे लक्ष वेधून घेत आहे. स्वतःची ओळख करून देणे हा या प्रतिष्ठानचा उद्देश आहे.
या शिबिरात कौटुंबिक हिंसाचारावरील संरक्षण कायदा, मासिक पाळी की मानसिक पाळी?, बचत गटांचे उत्पादन आणि त्यांची बाजारपेठ, तसेच महीलांना व्यक्त व्हायला संधी असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. एका वेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न हे प्रतिष्ठान करत आहे.अनेक बचत गटांनाही कल्पना आवडलेली आहे. शहर आणि ग्रामीण भाग यांचा सहभाग यामध्ये असणार आहे. काळाबरोबर चालायचे तर होणारे बदल हे आपण आचरणात आणायला हवे आणि या महिलांनां आपल्यासोबत घेऊन जायला हवे असे मत रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी व्यक्त केले.लवकरच हे ऑनलाइन जनजागृती शिबीर घेतले जाणार असून त्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे कळवण्यात येणार आहे. यामुळे निश्चितच फरक पडेल असा विश्वास आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा