एलईडी मासेमारी मर्यादीत क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

 

रत्नागिरी :- स्थानिकरित्या पारंपरिक पध्दतीने तसेच रापण पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांचे नुकसान होवू नये यासाठी एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद करा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेळेआगर येथील मच्छिमारांच्या समस्यांबाबत रत्नागिरी येथून दृकश्राव्य प्रणालीद्वारे झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजन साळवी, सिंधुदूर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची उपस्थिती होती.

या ठिकाणी 12 नॉटिकल माईल्सनंतर पुढील समुद्रात मासेमारी करण्याची मुभा पर्सेसीन मच्छिमारांना असली तरी ते किनाऱ्याजवळ येताना मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छिमारांचे नुकसान होत आहे याकडे मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने लक्ष देवून कारवाई करावी, असे सामंत म्हणाले.

वेळेआगर येथे समुद्रात पॅरासिलिंगमुळे मासेमारीकरिता मासे उपलब्ध होत नाहीत याचा त्रास पाच हजार मासेमार कुटूंबांना होतोय त्यामुळे पॅरासिलिंग बंद करण्याची मागणी स्थानिक मासेमारांनी या बैठकीत केली. याबाबत एक समिती स्थापन करुन अभ्यासाअंती निर्णय  घेतला जावा तोवर येथील पॅरासिंलिंग बंद ठेवण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.

मत्स्य विभाग, मेरीटाईम बोर्ड, विद्यापीठातील अभ्यासक यांच्या समावेशासह समिती गठित करुन याबाबत अहवालानंतर अंतिम कारवाई होईल. सिंधुदूर्गातील विविध रस्ते व बांधकाम याबाबत नंतर झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

टिप्पण्या